ठाणे : प्राणिप्रेमींतर्फे वन्यजीवगणनेचा कार्यक्रम आज, १० मे रोजी ठाण्यात राबवला जाणार आहे. ठाण्यातील येऊर, तुंगारेश्वर अभयारण्य, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या अभयारण्यांमध्ये त्यासाठी जवळपास ५० मचाणे उभारण्यात आली आहेत. सोडत पद्धतीने या उपक्रमातील निरीक्षकांची निवड करण्यात येते. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून उद्या सायंकाळी पाचपर्यंतच्या २४ तासांत ही वन्यजीवगणना पार पडेल.
दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिप्रेमींतर्फे वन्यजीवांची गणना केली जाते. बुद्धपौर्णिमा साधारण मे महिन्यात येते. जंगलामधील बरेचसे पाणवठे या काळात आटलेले असतात. ज्या मोजक्या पाणवठ्यांमध्ये पाणी असते, तेथे हमखास प्राणी, पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. उन्हाळा आणि पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश यांचा योग्य मेळ साधून या दिवसाची निवड प्राणिगणनेसाठी करण्यात आली आहे. या पौर्णिमेला चंद्राचा प्रकाशही वर्षातील इतर पौर्णिमांच्या तुलनेने सर्वाधिक असतो.
यासाठी वन विभागातर्फे पाणी असलेल्या पाणवठ्यांजवळ तात्पुरती मचाणे बांधली जातात. इच्छुक प्राणिप्रेमी, प्राणिनिरीक्षक मचाणांवर प्रत्यक्ष २४ तास राहून पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांची नोंद ठेवतात. वन विभागातर्फे प्राण्यांची गणना करण्यासाठी जंगलामध्ये असलेल्या प्राण्यांची यादी प्राणिप्रेमींना दिली जाते व पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांनुसार त्या यादीमध्ये संख्या भरणे अपेक्षित असते. ही खरे तर वन्यजीवांची गणना करण्याची जुनी पद्धत आहे. हल्ली अनेक ठिकाणी पाणवठ्याजवळ कॅमेरा लावूनही ही गणना करता येऊ शकते.
'वन्यजीवांची आवड असलेल्यांना केवळ याच निमित्ताने दिवसभर जंगलातील मचाणावर बसून प्राणी न्याहाळायची संधी मिळते. अनेक वन्यजीवप्रेमी वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतात. इतक्या उन्हाळ्यात खरे तर दिवसभर अशा मचाणावर शांत बसणे अवघड वाटले असते; पण आपल्या पाणवठ्यावर एखादा वाघ किंवा बिबट्या पाणी पिताना दिसल्यानंतर या साऱ्या मेहनतीचे सार्थक झाल्याचा आनंद या प्राणिप्रेमींना मिळतो. हा आनंद वन्यजीवप्रेमींना मिळावा यासाठी ही पद्धत अजूनही वन विभागाने चालू ठेवली आहे,' अशी माहिती बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वन संरक्षक मोहन नाईकवाडी यांनी दिली आहे.